ऋतू बदलला उन्हाळा संपला, पावसाळा सुरु झाला. आपली भूक अचानक कमी झाली, पाण्याची गरज सुद्धा पूर्वीपेक्षा उणावली. परंतु आपण कशाचीच उणीव भासू दिली नाही. पूर्वीसारखेच ढासू जेवण, तेवढेच पाणी. परिणामी अनेकांना जुलाब झाले कारण शरीराने जुलाबाद्वारे अति ते बाहेर फ़ेकले. त्याच परिणामी बरेच जणांना उलट्या झाल्या. काहींच अम्लपित्त वाढण्यावर निभावलं. उलटी वा जुलाबाद्वारे बाहेर पडण्याचे भाग्य सर्वांना नाही लाभलं. अशांना Constipation (मलबद्धता) झाले, पोट फ़ुगलं, पोट दुखलं, तोंडाला चव वाटेनाशी झाली, अना उशीरा पचू लागले, अनेकांना उगीचच थकवा जाणवू लागला. काहींनी तर टॉनिकची मागणी सुद्धा केली. बरेच जणांना डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी सारखे वाताचे विकार वाढले. अनेकांना अंगावर पित्त उठले, त्वचेचा कुठलाही विकार असल्यास तो उमळला. दमेकरी लोकांना सर्दी जाणवू लागली. आता लवकरच श्वास लागणार अशी भिती मनात आली तोच धाप लागायला लागली. पाऊस आला काय त्यांची तर सुख चैनच हरपली.
पुरे झाले हे ऋतु बदलाचे कौतुक ! महत्वाचा प्रश्न आहे, यावर ईलाज काय ? पावसाळा म्हणजे बस्ती या गणितामुळे या ऋतुतील “सब दुखों के लिए एक ही दवा बस्ती !“ एका पुस्तकात वाचलं होतं ’ ज्याचं पोट साफ़ त्याला सब रोग माफ़’ वर्षातील तीन ऋतूत पंचकर्म विभागलेली आहेत. शरदात विरेचन, रक्तमोक्षण असेल तर वसंतात वमन. पण आता विरेचनाच्या आठवणीत रमण्याचं, पुण्याईत जगण्याचं कारण नाही ; आत्ताचं पंचकर्म आहे….बस्ती !!!
ज्यांच पोट व्यवस्थित साफ़ होत नाही.त्यांना मलावरोध, लघवीच्या तक्रारी, शुक्रासंबंधी आजार, पाळीविषयी विकार, पोटात गोळा येणे, पोट फ़ुगणे, कंबर दुखणे, अम्लपित्त, डोकेदुखी, सर्दी, मूळव्याध, आदि विविध आजार, छळायला तयार होतात. या सर्व आजारांचा एकच ईलाज तो म्हणजे बस्ती.
अपानोऽपानग: श्रोणिबस्तिमेढ्रउरुगोचर: ।
शुक्राआर्तव शकृत् मूत्र गर्भ निष्क्रमणक्रिय: ॥
वायुच्या / वातच्या पाच प्रकारांपैकी “अपानवायु” हा गुदस्थानी राहातो आणि कुल्ले, मूत्राशय, शिश्न व मांड्या ह्या स्थानात संचार करतो; व शुक्र, पाळी, मल, मूत्र, गर्भ यांच्या शरीरातून बाहेर पडण्यावर नियंत्रण ठेवतो. वात हा दोष संपूर्ण शरीर व्यापी जरी असला तरी ’पक्वाशय’ म्हणजे मोठे आतडे (Large Intestine) हे त्याचे मुख्य स्थान होय.
बस्ती म्हणजे एनिमाप्रमाणे सोपी क्रिया. गुदद्वारावाटे औषधी द्रव्य पोटात ढकलणे याला बस्ती असे म्हणतात. वाताचे मुख्य स्थान असलेल्या पक्वाशयात बस्ती जात असल्याने बस्ती ही वाताची सर्वश्रेष्ठ चिकित्सा मानली जाते.
वातस्य उपक्रम: ………स्निग्धोष्णा बस्तयो बस्तिनियम: ।
बस्ती आणि एनिमा एकच का ?
नाही. बस्ति देण्याच्या क्रियेवरुन बस्तिची तुलना आधुनिक वैद्यक शास्त्रातील ’ एनिमा ’ या प्रकाराशी केली जाते. परंतु बस्ति व एनिमा हे दोन्ही वेगवेगळे उपक्रम आहेत. कारण एनिमाच उपयोग फ़क्त ग्रथित मलाचे निर्हरण करण्यासाठी केला जातो. याऊलट आयुर्वेदिक्त बस्ती कडून मलनिर्हरणच नव्हे तर इतर अनेक चिकित्सा उपयोगी कर्मे अपेक्षित आहेत. बस्तिद्वारा अनेक औषधे शरीरामध्ये प्रविष्ट करता येत आसल्याने दोषांचे शोधन (Detoxification) , शमन (Pacification), मलसंग्रहण, कृश व्यक्तिला स्थूल करणे, स्थूल व्यक्तिला कृश करणे, नेत्राचे कार्य प्राकृत ठेवणे, शुक्रजनन, वय:स्थापन करणे, बल वाढविणे, वर्ण उजळणे अशा अनेक प्रकारची व अनेक क्षेत्रामध्ये बस्तिचे कार्य दिसून येते. प्रधान्याने वात दोषाची बस्ति ही प्रमुख चिकित्सा आहे.
Schedule your appointment today at Ayurmind Hospital for natural and effective Ayurvedic treatment.